"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "
“स्पर्धा संपली मी नाही "......
सायंकाळची वेळ होती. नुकतच बाहेरून रूम वरती आलो होतो. थोडावेळ फ्रेश होऊन, निवांत खुर्चीवर बसलो. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. माझा नेहमीचा छंद म्हणून, दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी,माझ्या लॅपटॉप वरती जुनी गाणी लावून ऐकू लागलो. शांत बसून गाणे ऐकणे हा माझा नेहमीचा छंद!.....संगीत! ईश्वरांन मानवाला दिलेली एक मोठी देणगीच ना! या धावपळीच्या जीवनात आपण आपलं जगणं विसरत चाललो असलो तरी, गाणी ऐकताना कित्येक वेळा मला माझं जगणं सापडत. कधी मला बालपण आठवतं, कधी माझ तारुण्य, कधी माझं प्रेम आठवतं, .खरंच मला गाण्यात जगणं सापडत. कारण गाणं म्हणजे फक्त संगीत नाही. तो एक भावनिक आणि मानसिक आनंद आहे. असंच गाण्यात रमून गेलो असताना, अचानक फोन वाजला...
मित्र म्हणाला चल,थोडा वेळ सिटी मध्ये जाऊन येऊ. थोडी एक, दोन काम आहेत. आप्पा बळवंत चौकाकडील भागाकडे जायचं असल्यामुळे मी हो म्हटलं. कारण मला तिथून काही पुस्तक खरेदी करायची होती. लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्यामुळे, अनेक पुस्तकांचा संग्रह मी माझ्याजवळ केला आहे. पुस्तकांन एवढा खरा सोबती, आजच्या घडीला सापडणं अवघडच आहे." पुस्तक म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा" या सगळ्या विचारात गुंतलो असताना मित्र खाली येऊन थांबला. त्याच्यावर गाडीत बसून आम्ही सिटी जाऊ लागलो. तो मला एबीसी चौकामध्ये सोडून, त्याचं काम करण्यासाठी गेला. मीही एक-दोन स्टॉल वरती काही पुस्तक चाळली. व आवडणारी एक-दोन पुस्तक खरेदी केली. मित्र त्याचं काम उरकून पार्किंग मध्ये थांबला होता . मीही त्याला जाऊन मिळालो. पुढील प्रवास करताना, तो मला म्हणाला, जाता जाता एका मॉल मध्ये जाऊ. थोडीशी खरेदी करायची आहे. आणि आम्ही मॉल कडे वळालो. बोलता- बोलता आम्ही मॉल च्या पार्किंग मध्ये पोचलो. मित्र गाडी पार्क करत होता. आणि तेथील एक वॉचमन त्याला पार्किंगसाठी मदत करत होता. मी मात्र थोडं मोबाईल मध्ये रमलो होतो. गाडी पार्क होताच आम्ही पुढे जाऊ लागलो. तितक्यात माझी नजर वॉचमनकड गेली. मला हा चेहरा काहीसा ओळखीचा वाटला. कोण आहे हा? असा विचार करत असतानाच,
अचानक 'मला आठवलं, अरे!हा तर निरंजन!'
![]() |
| एकाकी जीवन जगताना पुस्तकाशी साधलेला संवाद |
मी त्याच्या जवळ जाऊन आपुलकीने विचारलं? अरे निरंजन इथं कसा? सुरुवातीला त्यानेही मला ओळखलं नाही. तशी त्याची माझी खूप अशी मैत्री नव्हती. मात्र नेहमीची तोंड ओळख होती. निरंजन आणि मी पुण्यामधील एका अभ्यासिकेमध्ये आयुष्याची काही वर्षे घालवली होती. अभ्यासिकेमध्ये दुपारी जेवणाच्या वेळी, किंवा सायंकाळी चहा घेताना आम्ही थोडा वेळ बरोबर घालवलेला. आयुष्याची उत्तुंग स्वप्न घेऊन स्पर्धा परीक्षेशी दोन हात करण्यासाठी मराठवाड्यातून आलेला, एक मितभाषी मुलगा म्हणजे निरंजन. "एक पातळ शरीरयष्टीचा, चेहऱ्यावर काळजीचं ओझं, पण डोळ्यात स्वप्नांची झळाळी..असणारा मुलगा म्हणजे निरंजन" स्पर्धा परीक्षांच्या त्या विश्वातून मी बाहेर पडल्यावर, तेथील फारशी कोणाशी भेट झाली नाही. कित्येक दिवसानंतर निरंजन आज मला भेटलेला. त्यालाही खूप दिवसानंतर कोणीतरी ओळखीचे भेटल्यामुळे थोड हायवस वाटलेलं. त्यानेही मनापासून माझी चौकशी केली. तो बोलत असताना, अभ्यासिकेमध्ये भेटलेला निरंजन मला वाटत नव्हता. खोल गेलेला आवाज, चेहऱ्यावर चिंतेची एक छटा, आणि नकळत पाणवलेल्या डोळ्यांच्या कडा. सगळं मला जाणवत होतं. मी त्याच्या खांद्यावरती हात ठेवून, अगदी काळजाला स्पर्श करून विचारलं, काय झालं? तू इथे कसा? कित्येक दिवस मनामध्ये साठलेल्या दुःखाचा ज्वाला अग्निफुटावा तसा निरंजन मला बोलू लागला.
मराठवाड्यातील एका गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबातील माझा जन्म. पोटापुरती दोन एकर जमीन ती कोरडवाहू, पावसाच्या जीवावर असणारी. आई-वडिलांनी काबाडकष्ट आणि मोलमजुरी करून मला बारावीपर्यंत शिकवलं. आपण लवकरच कामाला लागून आई-वडिलांचे दैन्य फेडावं म्हणून, बारावीनंतर D.ed.केलं. त्यानंतर मात्र लवकर शिक्षक भरती निघालीच नाही. आई-वडिलांचे कष्ट पाहत होतो, आणि घरातील दैन्य ही. त्यामुळे शिक्षकाची पात्रता असताना, दोन वर्षे पोलीस भरतीसाठीही पळालो. पण तिथेही अपयशच पदरी आलं. असे हे अपयशाचे जीवन जगता जगता, पदी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आमच्या मराठवाड्यामध्ये नोकरीच्या फारशा संधी नसल्यामुळे, आमच्याकडील बरीच मुलं नशीब आजमवण्यासाठी मुंबई, पुण्याकडे येतात. मी लहानपणापासून घरातील दैन्य पाहत होतो, आई-वडिलांच कबाड कष्ट, कोरडवाहू शेती, थकत चाललेले वडील, आणि जीवन जगण्याचा संघर्ष, मला स्वस्थ.... बसून देत नव्हता.
![]() |
| "मुलाच्या स्वप्नासाठी राबणारा बाप – मातीतला खरा हिरो" |
त्यामुळे मी ही आयुष्याची उत्तुंग स्वप्न घेऊन, आई-वडिलांच्या कष्टाच सोनं व्हावं म्हणून, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये आलो. सुरुवातीची तीन-चार वर्ष अफाट मन लावून अभ्यास केला. पण जसं जसं अपयश येत गेलं, तसा तसा मी आतून तुटत गेलो. काही म्हणून केलं नाही या कष्टाच्या काळामध्ये. गावाकडून आई-वडील जास्त पैसे पाठवत नाहीत म्हणून, एक वेळच्याच मिस वरती जेवण करून दिवस काढले. कधी अभ्यासिकेत झाडू मारण्याचे ही काम केलं. पण जणू काय अपयश पाचवीलाच पूजलं आहे. असं वाटावं की काय? तसं अपयशाने माझी साथ सोडलीच नाही. शिक्षकाच्या नोकरीसाठी दरवर्षी टीईटी देत राहिलो. दोन वेळा डेड दिली. पोलीस भरतीसाठी हे दोन वर्षे पळालो. तिथेही अपयश पदरी पडलं. बाकीच्याही स्पर्धा परीक्षा सतत देत राहिलो. पण थोड्या थोड्या मार्कानं कायमच यशानं हुलकावणी दिली. हे सांगताना त्याचा हुंदका दाटून आला होता. डोळे पाण्याने डबडबले होते. आणि हे दुःख मी ही खूप जवळून अनुभवलं होतं. अपयश काय असते हे मी अनुभवलं होतं. त्यामुळे मला त्याचं सर्व दुःख माझ्या काळजात भिडत होतं. स्पर्धा परीक्षांचे भयान वास्तव्य, जीवघेणी होत चाललेली स्पर्धा, शंभर पैकी फक्त 1% असणारा सक्सेसचा रेशो. आणि अंगात गुणवत्ता,पात्रता असूनही दरवर्षी अपयशी होऊन बाहेर पडणारे लाखो मुलं. हे मी सगळं पाहिलं, होतं अनुभवलं होतं.
मी त्याला धीर देण्यासाठी बोलू लागलो. अरे संघर्षाच्या मातीत आपला जन्म झाला आहे. एवढ्या वरती तुटून जाऊ नको. पुन्हा उभा रहा. आयुष्य जगण्यासाठी नवीन मार्ग शोध. हे त्यालाही कळत होतं. आणि तेवढा तो खंबीर ही होता. पण त्याची कहाणी एवढ्यावर संपली नव्हती. तो सांगू लागला, नियती ज्यावेळेस आपल्यावर सूड घेऊ लागते. त्यावेळेस ती चारही बाजूने आपल्यावर वार करते. अमावस्येच्या रात्रीने आयुष्यभर गराडा घालावा. तशा काही कात्रित मी सापडलो. D. ed.ला असताना घरची परिस्थिती नसल्यामुळे, शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतलं होतं. पण नोकरी लागली नाही त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला. पण तिकडे मात्र कर्ज आणि त्याचे व्याज वाढत राहिलं. इथं दोन वेळचे जेवणाची भ्रांत असताना, मी घेतलेल्या कर्जासाठी बँकेने वडिलांना कोर्टामध्ये उभं केलं. ते माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठ अपयश होत. त्यावेळी मी इतका तुटलो , की आत्महत्येचेही जवळ जाऊन आलो. पण नशिबाने मला मरू दिला नाही. कदाचित अजून कसला तरी सूट घ्यायचं असेल.
त्याचा एक एक शब्द काळजाला भिडत होता. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेत आलेलं अपयश. शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा झालेला डोंगर. रोजचे जीवन जगण्यासाठी चाललेली धडपड. हे सगळं सोसत असताना, आम्ही आमच्या दुःखाच्या पंतरवाळ्या घेऊन कोणाकडे जायचं. जगण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा तर, उद्योगासाठी बँक कर्ज देत नाही. कारण आमच्यावर आधीच कर्ज. मीही समाजचा एक घटकच ना, अडचणीत आल्यामुळे तुम्ही बाकीच्या घटकांना, शेतकऱ्यांना, उद्योगपतींना वेळोवेळी कर्जमाफी देता. मग मीही अपयशी झालो आहे , तुटून पडलो आहे. मग हे माझं दुःख घेऊन मी कोणाच्या दारात जाऊ? का माझ्यावर असणाऱ्या या कर्जासाठी मलाही आत्महत्या करावी लागेल? मग होईल का? मला कर्ज माफ. मग मी शोधू शकेल का, नवीन जीवन जगण्याचा मार्ग? पण त्यावेळी मात्र मी या जगात नसेल रे! मित्रा!.
आता मात्र त्याच्या बोलण्याने मीच तुटून पडलो होतो.
![]() |
| "जगापासून थोडा दूर... स्वतःच्या जीवनाचे उत्तर शोधणारा 'गुमनाम'..." |
कसंतरी स्वतःला सावरून त्याला विचारलं . आई वडील कसे आहेत. तो बोलला कसे असणार, माझ्या यशाची वाट पाहत डोळे लावून बसले आहेत मी येणाऱ्या वाटेकडे पहात . मीही कधीतरी एका अंधेरी रात्रीच गावाकडे जाऊन येतो. या वॉचमनच्या नोकरीत जे काय मिळतील ते पैसे त्यांना देऊन येतो. गावाकडे जास्त रमत नाही. कारण समोरून येणारा जो तो माणूस एकच प्रश्न विचारतो?
कधी होणार आहेस अधिकारी..
अपयशाने आतून तुटलेला मी, या प्रश्नाचे उत्तर कोणालाच देऊ शकत नाही ."पाच वर्ष सतत पुस्तकांत डोकं खुपसून बसल्यामुळे आता अंगाला श्रमही नकोसे वाटतात..."
त्यामुळे सिक्युरिटीची नोकरी बरी वाटते. थोडं फार बसून काम करायला मिळतं. थोडा फार मोकळा वेळ मिळाला तर, पुस्तक चाळत बसतो. कारण तेच एक जवळचे आधार वाटतात. "एकटे असताना जिवाभावाचे सोबती वाटतात". कारण मी या जगापासून आता गुमनाम झालो आहे. पुस्तकच माझी मित्रासारखी सोबती करतात. तेवढ्यात त्याच्या एका मोठ्या साहेबांन त्याला आवाज दिला. जाता जाता मला आवर्जून सांगून गेला. समाजाची नजर बदलणं खूप गरजेचे आहे रे! लोक फक्त यश पाहतात, जीवघेणा संघर्ष कोणी पाहत नाही. स्पर्धा परीक्षा म्हणजे यशच! हाच शिक्का आपल्यावर बसावा. हीच अपेक्षा प्रत्येक जण आपल्याकडून ठेवतो. त्यामुळे लाखो अपयशी विद्यार्थी माझ्यासारखं गुमनाम जीवन जगू लागतात..
जाता जाता बोलला,
“स्पर्धा परीक्षा संपली… पण मी नाही!”
“गुमनाम मी, पण स्वप्न अजूनही जिवंत आहेत!”
आपल्या कामाकडे जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे पाहून माझ्या मनात प्रश्न आला..
“कधी कधी हरलेलं आयुष्यही काहीतरी शिकवून जातं…”
अपयश म्हणजे... जीवनभर अपयशीच का?
अपयश पाहताना,त्याचा संघर्ष, त्याची घुसमट, हे ही पहावं आणि आधाराचा एक हात त्याच्या पाठीवर कायम ठेवावा.. अशी मानसिकता प्रत्येकाचीच व्हायला पाहिजे ना?
यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की कळवा. मी तुमच्या कमेंट ची वाट पाहत आहे...
आपलाच ब्लॉगर लेखक कुलदीप लोंढे....
# माणुसपण
https://socialthinkme.blogspot.com/2025/04/blog-post.html?m=1
Follow me: Facebook | Instagram
Share:
Facebook |
Twitter |
WhatsApp
लेखक: कुलदीप लोंढे
कस काय सुचतंय खरंच खुप छान लिहिले आहे अप्रतिम
उत्तर द्याहटवाThanx
हटवावास्तवाच छान विश्लेषण
उत्तर द्याहटवाTHANX
हटवाNISHABD
उत्तर द्याहटवा